टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’   

समाजप्रबोधनासाठी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

पुणे : आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याबाबत जनतेमध्ये, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागातील दुसर्‍या वर्षातील ’बीसीए’ वर्गातील चार विद्यार्थ्यांनी हेब्सिबा, अथर्व, उदिता आणि विशाल यांनी एक विशेष उपक्रम राबवत ‘सायबर क्राईम जनजागृती’ या विषयावर संस्कृती नॅशनल स्कूल मध्ये माहितीपर सत्राचे आयोजन केले. 
 
या सत्रात विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर, समाज माध्यमावरील फसवणूक, फिशिंग, पासवर्ड सुरक्षेचे महत्त्व, ओळखीचे बनावट प्रोफाईल्स, डिजिटल फूटप्रिंट्स, आणि सायबर कायदे यासंबंधी सोप्या आणि समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली. दृश्य सादरीकरण, उदाहरणे आणि संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विषय प्रभावीपणे मांडला.शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमार्फत मिळालेली ही माहिती केवळ शैक्षणिकच नव्हे, तर रोजच्या डिजिटल जीवनात अत्यंत उपयुक्त आहे. अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे.
 
सत्राची संकल्पना, नियोजन, सादरीकरण आणि संवाद कौशल्य यामध्ये या विद्यार्थ्यांनी दाखवलेली तत्परता आणि आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. यामुळे केवळ त्यांच्या ज्ञानाचा विकास झाला नाही, तर सामाजिक जाणिवाही अधिक समृद्ध झाली. संगणक विज्ञान विभागाचे समन्वयक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराचे अभिनंदन करत सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठातच नव्हे, तर समाजातही आपले ज्ञान सामायिक करून नेतृत्व करावे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
 
विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी आणि ज्ञानवर्धक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नेहमीच अग्रेसर आहे. विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नव्हे तर समाजासाठीही शिकत आहेत, यावरुन दिसून येत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक आणि विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

Related Articles